प्राची कुलकर्णी -
मुंबई : बंडखोरांना हॉटेलबाहेर पडण्यासाठी देखील परवानगी घ्यावी लागत असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं आहे. आज झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आणि उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी काल शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार मुंबईत दाखल झालेत.
हे सर्व आमदार मागील काही दिवसांपासून गुवाहाटी आणि नंतर गोव्यामध्ये वास्तव्याला होते. यावेळी त्यांच्यासाठी हॉटेलबाहेर कडक पोलिस बंदोबस्त होता हे सर्वांनाच माहित आहे. मात्र, आता हे आमदार मुंबईत (Mumbai) आले असताना देखील त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला जाण्यासाठी देखील परवानगी घ्यावी लागत असल्याचं समोर आलं आहे. साम टीव्हीशी बोलताना सेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.
पाहा व्हिडीओ -
पाटील म्हणाले, आम्ही सर्व आमदारांनी केलेला प्रवास आपणाला माहित आहे. आज अनेक दिवसांनी मी कार्यकर्त्यांना भेटायला आलो. ज्या लोकांच्या भरवशावर मी ४ वेळा मंत्री झालो, आमदार झालो त्यांना भेटण्यासाठी आज आपण परवानगी घेऊन आलो. चार-पाच दिवसांपासून मतदार संघातील लोकं वाट बघत होते त्यामुळे या लोकांना भेटायला जाण्याची परवानगी द्या; असं सांगून आपण खाली आल्याचं पाटील यांनी सांगितलं.
तसंच या लोकांशी भेटल्यावर आपण हा निर्णय का घेतला याबाबत त्यांना सांगितलं असून ते सर्व माझ्यासोबतच असल्याचंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरती सामच्या प्रतिनिधीनी त्यांना कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी देखील आपणाला परवानगी का घ्यावी लागतेय? असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले, 'काही पथ्य असतात, मी चौकटीत वागणारा नेता आहे. आधी उद्धवसाहेबांसोबत (Uddhav Thackeray) होतो त्यावेळी देखील त्यांच्या चौकटीत वागायचो त्यांचे देखील आदेश पाळले.
आता ज्यांच्याबरोबर आहे त्यांचे आदेश पाळणार असल्याचं ते म्हणाले. शिवाय याबाबत जास्त मोकळेपणाने सांगता येणार नाही. मात्र, काही नियम असतात ते पाळावेच लागतात असं गुलाबराव पाटील म्हणाले. तसंच व्हीपची पत्र रेकॉर्डवरती गेली आहे. व्हीपच्या बाबतचा निर्यणा आमच्याच बाजूने येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसेना (Shivsena) कोणाची? याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'ग्रामिण भागात एखाद्या ग्रामपंचायतीचे १० पैकी ६ मेंबर ज्या बाजुला जातात त्यांचा सरपंच होतो. पुर्ण गाव त्याच्याकडे जातो. इथे तर ५५ पैकी ४० आमदार एका बाजूला गेले आहेत. असं सांगत शिवसेना आपली असल्याचा दावाच त्यांनी अप्रत्यक्षपणे केला.
मात्र, आम्ही सेना सोडलेली नाही, सोडणार नाही. आम्ही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या विरोधात वक्तव्य केलेलं नाही. ठाकरे कुटुंबाच्या विरोधातही आपण काही वक्तव्य केलं नाही आमच्या हृदयात त्यांच्याबद्दल एक स्थान आहे आहे. वारंवार सांगून देखील काही गोष्टी घडल्या नाहीत त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला. शिवसेना शब्द आमच्यापासून वेगळा होऊ शकत नाही. तसंच यापुढे सेना आणि शिंदे गट यांच मनोमिलन होणार का? असं विचारलं असता तो निर्णय घ्यायचा माझा विषय नाही असंही ते यावेळी म्हणाले
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.