
सत्ता गेल्यावरती यांनी शाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिकांची आठवण आली. मात्र, सत्तेत असताना त्यांनी या लोकांची आठवण आली नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
काँग्रेसचा विरोध म्हणून सावरकरांच नाव आम्ही घ्यायचे नाही? मुख्यंमत्री पदासाठी लाचारी पत्करल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
एकनाथ शिंदेंने नेहमीच दिलं आहे, हा देणारा एकनाथ आहे घेणारा नव्हे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केला. शिवाय तुमच्यात आणि माझ्यात काय ठरलं होतं हे मी आज सांगणार नाही मात्र वेळ आल्यावर करेन असा इशारा शिंदे यांनी ठाकरेंना दिला.
काँग्रेसचा राक्षस गाडा, राष्ट्रवादी हरामखोर पक्ष आहे. ते जिथे खाजवतील तिथून पैसे काढतील. पैसे खाऊन यांची पोटं भरत नाहीत, अशा ठाकरी शैलीत बाळासाहेबांनी प्रहार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
पंतप्रधान मोदींना चहावाले बोलले त्या पक्षाचं काय झालंय ते पहा त्यामुळे पंतप्रधानांना काही वेडं वाकडं बोलू नका असं म्हणत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका केली.
शिवसेना ही काय तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, ती शिवसैनिकांत्या घामातून उभी राहिलेली संघटना आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
पीएफआयवर बंदी घातल्यानंतर काही लोकांनी आरएसएसवर बंदी घाला म्हटलं, आरएसएसचे देशाच्या उभारणीत योगदान आहे. संकट काळात आरएसएसने काम केलं असून हे म्हणतात RSS बंदी घाला असंही मुख्यमंत्री म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं तुम्हाला आवडलं नाही, परवडलं नाही. शिवसेनेच्या फायद्याचं सांगितलं तेही पटलं नाही, कारण तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची पाच वर्ष पुर्ण करायची होती असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
आजपर्यंत राज ठाकरे गेले, नारायण राणे गेले, आम्ही सगळे चुकीचे आणि एकटे उद्धव ठाकरे बरोबर कसे? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
आमदार खासदारांचं ऐकूनच आम्ही उठाव केला, मात्र तो का केला, हजारो शेकडो पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा का दिला याचं आत्मपरिक्षण करा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
आम्ही गद्दार नाही तर तुम्हीच गद्दार आहात, कारण तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली असून तुम्ही वैचारिक व्याभिचार केला असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये केली.
आम्ही बाप पळविणारी टोळी असेल तर, तुम्ही बापाचे विचार विकणारी टोळी आहात असं म्हणत शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.
गद्दार आणि खोके या दोन शब्दांशिवाय बोलायला विरोधकांकडे शब्द नाहीत. त्यामुळे गद्दारी झाल्याचं ते म्हणत आहेत.
ही शिवसेना ना उद्धव ठाकरेंची ना एकनाथ शिंदेची ही फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
बाळासाहेबांच्या विचारांची जपणूक करण्यासाठी आम्ही भूमिका घेतली, ती लपून छपून घेतली नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केलं.
वैयक्तीक स्वार्थासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे स्वाभिमान गहान टाकला आणि तुम्ही शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीकडे गहान टाकला अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली
आजच्या गर्दीने बाळासाहेबांचे खरे वारसदार कोण हे सांगितलं आहे. इथून पुढे प्रश्न उपस्थित व्हायला नको असं मुख्यमंत्री शिंदे भाषणात म्हणाले.
मला साथ द्या मी पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेन, बरं झालं बाडंगुळे आपल्यातून निघून गेले असं म्हणत ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला.
बीकेसीच्या मैदानातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले असून त्यांनी भाषणाआधी उपस्थितांना दंडवत घातला.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डा येऊन बोलले की, देशात कोणताच पक्ष शिल्लक राहणार नाही. याचा अर्थ भारतमातेला हुकूमशाहीकडे नेण्याचं काम सुरु असून हे तुम्हाला चालेल का? असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे म्हणाले, एकच पक्ष राहिला तर देशात गुलामगिरी येणार त्यासाठी देशप्रेमींनी एकत्र येऊन स्वातंत्र्य अबाधित ठेवायला हवं.
केवळ जपमाळ ओढणारा हिंदु होऊ शकत नाही, हातात जपमाळ आहे आणि समोर बंदूक असणारा आतंकवादी आला तर राम राम करुन फायदा नाही त्यासाठी तुमच्या हातात देखील बंदूकच हवी हे हिंदुत्व बाळासाहेबांनी आम्हाला दिलं असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकारला १०० दिवस झाले. मात्र या १०० दिवसांमधले ९० दिवस हे दिल्लीला मुजरा करायलाच गेले असा टोला ठाकरेंनी शिंदे सरकारला लगावला.
अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे घरगुती मंत्री आहेत. सतत या राज्यात जा त्या राज्यात जा काड्या घाल हे सरकार पाड ते सरकार पाड मुंबईत आले जमीन दाखवा असं म्हणत आहेत. शिवाय मी आव्हान देतो की आम्हाला जमीन दाखवाच पण पाकव्याप्त काश्मिरमधील जमीन दाखवा असं आवाहन ठाकरेंनी शहांना यावेळी केलं.
कोंबडी चोरांवर आणि बाप चोरांवर या व्यासपीठावरुन जास्त बोलायचं नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणेवर टीका केली.
गाईवरती नको महागाईवरती बोला असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला शिवाय हृदयात राम आणि हाताला काम द्या असंही ठाकरे म्हणाले.
कायदा आम्हा सर्वांना कळतो मात्र, कायदा आम्ही पाळायचा आणि डुक्करं तुम्ही पाळयची हे चालणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.
मी मुख्यमंत्री का झालो, महाविकास आघाडी का केली? याचं उत्तर एकच आहे ते म्हणजे भाजपने पाठीत वार केला म्हणून, त्यांना धडा शिकवण्यासाठीच मी महाविकास आघाडी केल्याचं उद्धव ठाकरेंनी आज सांगितलं.
विचित्र गोष्ट आहे की, ज्यांना मी सगळं काही दिलं ते माझ्यासोबत आहेत आणि ज्यांना मी सर्वकाही दिलं ते गेले असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली.
गद्दारीचा कलंक या जन्मात तरी पुसता येणार नाही. आता तुम्हाला मंत्रीपद जरी चिकटलं असली तरी ती काही काळासाठी आहेत असं म्हणत ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला
आजची परिस्थिती अभूतपूर्व आहे, ही गर्दी पाहून मी भारावून गेलोय, तुमचे प्रेम पाहिल्यावर मुद्दे असून देखील मला शब्द मिळत नाहीयेत. ही कोरडी गर्दी नाही ही जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हा ठाकरे कोणाच्या गोटात बांधला जात नाही, असा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवा आहे, मी एकनाथ शिंदेच्या प्रेमापोटी येथे आलो आहे. याला जपा हा एकटा नाथ होऊ देऊ नका असं आवाहन जयदेव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना घातलं.
बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे बंधू एकनाथ शिंदेच्या स्टेजवर दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असून, निहार ठाकरे देखील शिंदेंच्या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले आहेत.
शिवाजी पार्कमधील दसरा मेळावा हा खरा मेळावा असून बीकेसीमधील दसरा मेळावा नव्हे तर कचरा मेळावा आहे असं म्हणत जाधव यांनी शिंदे गटावर टीका केली.
सभ्य सुसंस्कृत माणसाला त्यांच्याच माणसाने गादीवरून खाली खेचलं त्यावेळी संपुर्ण महाराष्ट्र हळहळला असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भव्य तलवारीचं पूजन करण्यात आलं शिवाय शिंदे गटातील आमदारांकडून मुख्यमंत्र्यांना चांदीची गदाही भेट देण्यात आली.
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की ज्या दिवशी माझा मुख्यमंत्री येईल त्या दिवशी मशिदीवरील भोंगे खाली उतरेन. मात्र, त्यांच्या मुलाने काहीचं केलं नाही देवदेवतांची मस्करी करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले असा घणाघात अभिनेते शरद पोंक्षे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
नारायण राणे तुमच्या दोन वाह्याद बाजारबुणग्यांवर बोलणार नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे. तसंच नारायण राव तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. तुम्ही सोनियांच्या पायावर लोटांगण घालत आमदारकी खासदारकी, मंत्रीपद भोगली आणि आता आम्हाला हिंदुत्व शिकवता का अशी टीकाही त्यांनी राणेंवर केली.
शिवसेना एकट्या कोणाची नाही तर ती प्रत्येक शिवसैनिकाची असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी केलं आहे.
आम्ही आमचं व्ययक्तीक आयुष्य शिवसेनेसाठी वाहिलं असून आम्ही पैशावर विकणारी माणसं नाही. मात्र, युवराजांचे लहानपणच खोक्यात गेल्यामुळे ते खोक्याची भाषा करत असल्याची टीका खासदार राहुल शेवाळे यांनी केली.
हिंदुस्थानच्या राजकारणातील उद्धव ठाकरे ही पहिली व्यक्ती आहे, जो म्हणतो की माझा बाप चोरला असं म्हणत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे BKC मैदानात पोहचले असून त्यांच्या ताफ्यातील गाड्या बीकेसी मैदानात पार्क करण्यात आल्या आहेत. तर उद्धव ठाकरे शिवाजी पार्ककडे रवाना झाले असून ते काही क्षणातच मेळाव्याच्या ठिकाणी पोहचतील.
ठाकरे गटातील शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. नवी मुंबईतील पोलिसांनी शिवसैनिकांना धमकी देत शिंदे गटात या नाहीतर एन्काऊंटर करू अशी धमकी दिल्याचं सांगितलं आहे.
मी आधीच सांगितल होतं भाड्याने एकही माणूस आणणार नाही, भाड्याने एक ही गाडी लावणार नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे गटावर टीका केली,
मंत्रीमंडळ झाल्यावर मुख्यमंत्री गायब झाले ते अडीच वर्ष सापडलेच नाहीत, असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला
अडीच वर्षापुर्वीच तुम्ही शिवसेनेचे दोन तुकडे केले असल्याची टीका शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
भाषणाला सुरुवात करतानाच शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, ठाकरेंना फोन लावत ही गर्दी दाखवा आणि समोरची गर्दी दाखवा तेंव्हा त्यांना खरी शिवसेना कोणती हे कळेल असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
शिवाजी पार्कमधील उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यातील स्टेजजवळ 'मी माझ्या शिवसेनेला भाजपचा गुलाम होऊ देणार नाही' असं बॅनर लावत, शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
ठाण्यातील सभेत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी वापरलेली खुर्ची शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या स्टेजवर ठेवण्यात आली असून खुर्चीवर भगवी शाल आणि फुलांचा हार ठेवण्यात आला आहे. तर ठाकरेंच्या मेळाव्यात संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली आहे.
दसरा मेळावा सुरु व्हायला (Dasara Melava) काही क्षण उरले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे. यामध्ये " मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे " असं लिहीत आपणच बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहे. असं सांगण्याचा प्रयत्न मुख्यंमत्र्यांनी केला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.