
Ulhasnagar News : उल्हासनगर शहरात रस्त्याच्या कडेला धूळ खात पडलेल्या पडीक वाहनांवर महापालिकेनं कारवाई सुरू केली आहे. ही वाहनं हटवण्यासाठी महापालिकेकडून वाहन मालकांना ४८ तासांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर ही वाहनं जप्त करून महापालिका त्यांची विल्हेवाट लावणार आहे.
उल्हासनगर (Ulhasnagar) शहर हे अतिशय दाटीवाटीचं व्यापारी शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरात नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच शहरातल्या अनेक रस्त्यांच्या कडेला वापरात नसलेली अनेक वर्षांपासून धुळखात पडलेली वाहनं लावून ठेवलेली आढळतात. या वाहनांमुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचं उल्हासनगर महापालिकेच्या निदर्शनास आलं. त्यामुळे वाहतूक विभाग आणि आरटीओ सोबत झालेल्या संयुक्त बैठकीत ही वाहनं रस्त्यावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील अशा पडीक वाहनांवर 'बेवारस वाहन' असे स्टिकर्स लावले आहेत. यानंतर ही वाहनं ४८ तासात तिथून हटवण्याचे आदेश महापालिकेने दिले असून त्यानंतरही ही वाहनं तिथे आढळून आल्यास महापालिका ही वाहनं जप्त करणार आहे.
तसेच त्यानंतरही ही वाहनं घेण्यासाठी मालक समोर न आल्यास त्यांची महापालिकेकडून थेट विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे. त्यामुळे वाहन मालकांनी पुढील ४८ तासात ही वाहनं रस्त्यावरून हटवावीत आणि ज्या वाहनांची मुदत संपली असेल त्या वाहनांची विल्हेवाट लावावी, अन्यथा महापालिका या वाहनांवर कारवाई करणार असल्याचं लेंगरेकर यांनी सांगितलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.