
मुंबई: मुंबईचं फुप्फुस असलेल्या आरे कॉलनीमधील (Aarey Colony) हजारो झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी प्रचंड संख्येने वृक्षतोड केली गेली होती आणि आता पुन्हा झाडं तोडण्यात येणार आहे. याला पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध आहे. वृक्षतोडीविरोधात आता वंचित बहुजन आघाडीही मैदानात उतरली आहे. आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीविरोधात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) रस्त्यावर उतरणार आहे. रविवारी, ७ ऑगस्टला वंचित बहुजन आघाडी महामोर्चा काढणार आहे. (Prakash Ambedkar Latest News)
हे देखील पाहा -
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मेट्रो कारशेड बांधण्याचा घाट शासनाने घातलेला आहे. याविरोधात रविवारी आंदोलन आहे. आरे हे मुंबईतील ऑक्सिजनचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे. ऑक्सिजन तयार करणारा हा मोठा परिसर संपला तर मुंबईत राहणं अवघड होईल अशी परिस्थिती आहे. याच्याविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रकाश आंबेडकरांकडून करण्यात आलं आहे. रविवारी ७ ऑगस्ट २०२२ ला सकाळी ११ वाजता, पिकनिक पॉइंट आरे कॉलनी, गोरेगाव याठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. (VBA Agitation To Against Aarey Colony Tree Cutting)
याविरोधात सुप्रीम कोर्टाने आरेमधील झाडं तोडण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी होईपर्यंत झाडं न तोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. आरे कारशेडवरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे आता आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आरे कारशेडवर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मेट्रोचे काम थांबले होते. आरे कारशेडला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कारशेडवर स्थगिती दिली होती. मात्र, शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात येताच पुन्हा हा निर्णय बदलण्यात आला आणि मेट्रोचे कारशेड आरेतच होणार असं या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यामुळे आता पर्यावरणप्रेमींसह अनेक संघटना आणि राजकीय पक्ष मेट्रो कारशेडचा विरोध करत आहेत.
काही दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेड तिथेच होणार असल्याचे संकेत दिले होते. 'कारशेडचे काम झाल्याशिवाय मेट्रो सुरु होणार नाही. शिवाय ठाकरे सरकाने सुचवलेली कांजूरमार्ग येथील जागा वादात आहे. ठाकरे सरकारने दिलेल्या जागेवर आता काम सुरु केलं तरी ते पुर्ण व्हायला जवळपास ४ वर्ष लागणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी कारशेड त्याच ठिकाणी करणार असल्याचे फडणवीस म्हणाले होते.
मुंबईतील मेट्रो हा भाजपचा (BJP) महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे भाजपला तो प्रकल्प पूर्ण करायचा आहे. तर आरे मध्ये होणाऱ्या कारशेडला मुंबईतील पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. या कारशेडविरोधात मुंबईत मोठे आंदोलन झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आरे कारशेडला स्थगिती दिली होती.
एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर पुन्हा आरे कारशेड सुरू होणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या. आरेमधील जंगल तोडू नये म्हणून पर्यावरण प्रेमींनी आंदोलन केले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंदी उठवल्यानंतर पुन्हा आरे कारशेडचे काम सुरू होणार आहे. याला मात्र आता वंचित बहुजन आघाडी विरोध करणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.