Mumbai Weather: मुंबईसह राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. मार्च महिन्यातच उकाड्याने नागरिक हैराण झालेत. मुंबईत किमान तापमानाचा पारा ३७ अंशावर पोहचला आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील ७२ तासांत ठिकठिकाणी पाऊस आणि उन्हाचे चटके बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Weather Report)
राज्यात सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये देखील दोन दिवसांपूर्वी पावसाच्या सरी कोसळल्या. रिमझिम पाऊस पडल्याने नागरिक सुखावले होते. आता पुन्हा एकदा मुंबईत उन्हाची झळ बसताना दिसत आहे. मात्र पुढचे काही दिवस मुंबईमध्ये अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे.
मुंबई - पुणे शहरात १३ ते १५ मार्च या कालावधीत वादळी वार्यांसह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आलाय. शहरात ७ व ८ मार्च रोजी हलका पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, त्यानंतर लगेच कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यास सुरुवात झाली. शहराचे कमाल तापमान ३० अंशांवरून पुन्हा ३५ ते ३६ अंशांवर गेले आहे.
उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने शहरात १३ ते १५ मार्च या कालावधीत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा पुणे हवामान खात्याने दिला आहे. शहरात एकीकडे थोड्याशा पावसानेही नागरिक सुखावत आहेत तर दुसरीकडे शेतकरी या अवकाळीने त्रस्त झाला आहे. अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान होत आहे. तसेच राज्यात पुढील काही दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे.
लिंबूला चढला मोठा भाव...
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता जाणवायला लागली असून लिंबूची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वी ५० ते ६०रु. प्रति किलोने मिळणार लिंबू आता चांगलाच भाव खायला लागला आहे. लिंबूच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सामान्य जनतेच्या खिशावर पडत आहे. शेतकऱ्यांनाकडून कमी भावात लिंबू खरेदी करून व्यापारी नफेखोरी करताना दिसत आहेत. लिंबू चांगलाच महागला असून सध्या नंदूरबार जिल्ह्यात १०० ते १२० रु. प्रति किलोने विकला जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.