Politics: "राज्यपालांना परत बोलवा अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणार"; वादग्रस्त वक्तव्याबाबत सुप्रिया सुळेंची टीका

MP Supriya Sule Slams Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या या कृतीतून त्यांचा महाराष्ट्राविषयी द्वेष आणि मत्सर दिसून येतो असं सुप्रिया सुळे सामटीव्हीशी बोलताना म्हणाल्या.
MP Supriya Sule Slams Bhagat Singh Koshyari
MP Supriya Sule Slams Bhagat Singh KoshyariSaam TV

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे त्यांच्या वक्तव्याने नेहमी चर्चेत असतात. काल, शुक्रवारी राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. 'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका होतेय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली आहे. राज्यपालांचं वक्तव्य हुतात्म्यांचा अवमान करणारं आहे, याबाबत आपण राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असून राज्यपालांना परत बोलवा अशी विनंती करणार असल्याचं सुप्रिया सुळे सामटीव्हीशी बोलताना म्हणाल्या आहेत. (Supriya Sule Latest News)

हे देखील पाहा -

राज्यपालांवर टीका करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यपालांना परत बोलवा अशी मागणी मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करणार आहे. राज्यपालांच्या या कृतीतून त्यांचा महाराष्ट्राविषयी द्वेष आणि मत्सर दिसून येतो असं सुप्रिया सुळे सामटीव्हीशी बोलताना म्हणाल्या. तसेच संविधानिक पदावर असूनही ते सातत्याने असं वक्तव्य करुन दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आणि पाप ते करतायत. याचा मी जाहीर निषेध करते. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही आणि झुकणार नाही. मी याबाबत संसदेत बोलणार आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

आपल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "महाराष्ट्राचे राज्यपाल मा. भगतसिंह कोश्यारी यांचे विधान मराठी माणसांना कमी लेखणारे असे आहे. त्यांच्या विधानाचा मराठी माणूस म्हणून मी निषेध करते. याच मुंबईसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ हुतात्म्यांनी रक्त सांडले. लाखो मराठी माणसांच्या वज्रमुठीमुळे हे शहर उभा राहिले आहे.

राज्यपाल महोदयांचे हे विधान त्या हुतात्म्यांचा अवमान करणारे आहे. हे शहर कष्टकरी, कामगार आणि मजूरांनी कष्टाने उभारले. मुंबईवर पहिला हक्क या सर्वांचा आहे. जो या मातीत जन्माला आला आणि मुंबईवर प्रेम करतो त्या सर्वांसाठी ही 'आमची मुंबई' आहे" असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं आहे.

MP Supriya Sule Slams Bhagat Singh Koshyari
महाराष्ट्र भाजपाला राज्यपालांचे हे विधान मान्य आहे का? जयंत पाटील यांचा सवाल

राज्यपाल नेमकं काय म्हणाले?

आपल्या एका भाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते की, 'गुजराती, राजस्थानी राज्यातून निघून गेले तर आर्थिक राजधानी मुंबई राहणार नाही. राजस्थानी मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये,बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो. त्यांच्या याच वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com