Arvind Kejriwal Press Conference in New Delhi : दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणात कथितरित्या घोटाळा झाल्याच्या प्रकरणात सीबीआयने समन्स बजावल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. मी सीबीआयच्या कार्यालयात जाऊन जबाब नोंदवणार आहे, असे सांगतानाच भ्रष्टाचार झाला आहे तर, ते १०० कोटी रुपये गेले कुठे? अशी विचारणा केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींना केली. (Latest Marathi News)
सीबीआयने रविवारी बोलावलं आहे. नक्कीच जाणार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या म्हणण्याप्रमाणे केजरीवाल भ्रष्टाचारी आहे. पण असं असेल तर, या जगात कुणीच प्रामाणिक नाही. असा कुणीच असू शकत नाही, जो भ्रष्टाचारात बुडालेला नसावा, असे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले. ७५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्या राजकीय पक्षाला अशा पद्धतीने लक्ष्य केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, आधी क्रमांक तीनच्या नेत्याला अटक केली. नंतर दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याला अटक केली. हे सगळं यासाठी केलं की, पंतप्रधान मोदींना ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून माझ्या गळ्यापर्यंत पोचायचं आहे. हे काही असेच झालेले नाही. यामागे मोठे कारण आहे.
'आमच्याकडून देशातील जनतेला एक अपेक्षा आहे. त्याच अपेक्षा चिरडण्यासाठी केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला चिरडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गुजरातमध्ये मागील ३० वर्षांपासून सरकार चालवताहेत. पण फोटो काढण्यापुरतीही एखादी शाळा व्यवस्थित केलेली नाही,' असा टोला केजरीवाल यांनी लगावला.
अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत अबकारी धोरणाचे समर्थन केले. ते धोरण लागू झाले असते तर, भ्रष्टाचार संपुष्टात आला असता. हेच धोरण पंजाबमध्ये लागू केले आहे. त्यामुळे त्या राज्याचा महसूल ५० टक्क्यांनी वाढला आहे. दिल्लीत हेच धोरण लागू करू दिले नाही. पंजाबमध्ये ते लागू झाले आहे कारण तिथे यांचे काहीच चालत नाही, असेही केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, ''अबकारी धोरण कथित घोटाळा प्रकरणात मला अडकवण्यासाठी रोज कोणत्या न कोणत्या व्यक्तीला पकडलं जातं. त्याच्याकडून जबाब घेण्यासाठी मारहाण केली जाते. त्यांनी पाच अशा व्यक्तींची नावे सांगितली आहेत. अशा किती व्यक्ती आहेत, ज्यांच्यासोबत सीबीआय आणि ईडीने असे केले आहे.''
हे नक्की काय चाललंय, असा सवालही अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला. आता मला सीबीआयने समन्स बजावले आहे. उद्या मी सीबीआयच्या कार्यालयात जाणार आहे आणि तिथे मी जबाब नोंदवणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
वर्षभरापासून चौकशी सुरू आहे. आता १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला जात आहे. ४०० पेक्षा जास्त छापे मारले. मनीष सिसोदियांच्या घरच्या गाद्या देखील फाडून झडती घेतली. पण काहीच हाती लागलं नाही. भ्रष्टाचार झाला आहे तर १०० कोटी रुपये गेले कुठे असं मी पंतप्रधान मोदींना विचारू इच्छितो, असे केजरीवाल म्हणाले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.