गढवा: मुलीचं लग्न होऊन ती सासरी सुखात नांदावी, असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. मुलीची सासरी पाठवणी करताना बापाच्या डोळ्यांत अश्रू तरळलेले पाहायला मिळतात. डोळ्यांत अश्रू वाहत असतानाच हळवा झालेला बाप आपल्या जावयाला मुलीची काळजी घेण्यास सांगतो. पण झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील डंडई परिसरात वेगळाच प्रकार बघायला मिळाला. मुलीसाठी सजवलेल्या लग्नमंडपात तिच्या 'प्रेमळ' बापानंच आपलं तिसरं लग्न उरकून टाकलं.
गढवा जिल्ह्यातील डंडई पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. ५६ वर्षीय व्यक्तीनं आपल्या मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच तिसरं लग्न केलं. मुलीच्या लग्नासाठी ते मंडप सजवलं होतं. दुसऱ्या दिवशी याच लग्नमंडपात मुलीचं लग्न झालं. डंडई परिसरातील लवाही गावात हा प्रकार घडला. शिवप्रसादच्या मुलीचं लग्न २० एप्रिलला होणार होतं. मात्र, शिवप्रसादनंच त्या मंडपात लग्न उरकून टाकलं.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवप्रसादनं गावातीलच एका मुलीला तीन वर्षांपूर्वी फूस लावून पळवून छत्तीसगडला नेलं होतं. त्यानं मुलीला छत्तीसगडच्या एका गावात भाडेतत्वावर घेतलेल्या खोलीत ठेवलं असल्याची माहिती तिच्या आईला मिळाली होती. त्यानंतर तिनं शिवप्रसादच्या मुलीच्या लग्नात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांत पोहोचले. पोलिसांनी तपास केल्यानंतर, शिवप्रसादने तीन वर्षांपूर्वी ज्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते, ती आता सज्ञान झाल्याची माहिती मिळाली. तिला एक मुलगाही असल्याची माहिती उघड झाली. त्यानंतर ग्रामस्थांच्या दबावामुळं शिवप्रसादने तिच्यासोबत लग्न केलं. शिवप्रसादचे तीन लग्न झाले आहेत. पहिल्या लग्नानंतर त्याच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यानं दुसरं लग्न केलं. त्याला चार मुलं आहेत. आता त्यानं तिसरं लग्न केलं आहे. मुलीसाठी लग्नमंडप सजवला असतानाच, आदल्या दिवशी बापानं लग्न केल्याच्या घटनेमुळं परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.