
Congress Vs BJP in Karnataka Elections Results : अवघ्या देशाचं लक्ष कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अंतिम निकालाकडे लागलं आहे. २२४ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाल्याचे चित्र आहे. तर भाजप पराभवाच्या उंबरठ्यावर आहे.
कर्नाटक निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये पूर्ण बहुमताने काँग्रेस सत्तेत येईल, असे चित्र आता तरी दिसते आहे. त्यामुळे आतापासूनच काँग्रेसच्या विजयाची आणि भाजपच्या पराभवाची चर्चा देशातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कर्नाटकात भाजप पराभूत होण्यामागे कोणती कारणे असू शकतात, याबाबत राजकीय जाणकारांकडून वेगवेगळी मते मांडली जात आहेत. (Latest Marathi News)
कर्नाटकात भाजपला दिग्गज चेहरा मिळालाच नाही, हे एक कारण पराभवाच्या मागे असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना भाजपने मुख्यमंत्रिपदावर बसवलं असलं तरी, मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असूनही बोम्मईंना आपली छाप पाडता आली नाही. दुसरीकडे काँग्रेसकडे डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यासारखे चेहरे होते. बोम्मईंना पुढे करून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणं भाजपला महागात पडलं, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.
भ्रष्टाचाराचा मुद्दा हा एक भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसने भाजपच्या विरोधात प्रचाराच्या सुरुवातीपासूनच '४० टक्के कमिशनचं सरकार' हा मुद्दा घेतला. त्यामुळे हा एक मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा ठरलेला दिसला.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेच एस. ईश्वरप्पा यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर भाजपच्या एका आमदाराला तुरुंगात जावं लागलं. भाजपसाठी हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचारात अडचणीचा ठरला होता. ही अडचणच भाजपला अखेरपर्यंत दूर करता आली नाही.
कर्नाटकात भाजपला सत्तेचं समीकरण जुळवता आलं नाही, असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. भाजप सत्तेत असूनही व्होट बँक असलेल्या लिंगायत समाजासह मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी आणि वोक्कालिंगा समाजाचं मन जिंकू शकली नाही. दुसरीकडे काँग्रेस मुस्लिम, मागास वर्गीय, ओबीसी समाजापर्यंत पोहोचण्यात आणि लिंगायत समाजाचा आकर्षित करण्यात यशस्वी ठरल्याचे सांगितले जाते.
कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या आधी वर्षभरापासून भाजपने ध्रुवीकरणाचा प्रयत्नही केल्याचे दिसून आल्याचे सांगितले जाते. ऐन निवडणुकीत बजरंग बलीचाही जयघोष केला. पण धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न करूनही अपयश हाती आलं. भाजपने हिंदुत्वाचं कार्ड पुढे केलं, पण तोही अपयशी ठरल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
कर्नाटकात भाजपला मजबूत करण्यामागे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले आहे. पण यावेळच्या निवडणुकीत येडियुरप्पा हे कुठेच दिसून आले नाही. त्यांना पूर्णपणे बाजूला केल्याचे दिसले. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांची तिकीटं कापली गेली. त्यामुळे दोन्ही नेते काँग्रेसकडे गेले आणि निवडणूक मैदानात उतरले. येडियुरप्पा, शेट्टार, सावदी हे तिन्ही नेते लिंगायत समाजातील दिग्गज नेते मानले जातात. याच गोष्टीकडे कानाडोळा करणे भाजपला महागात पडले, असे बोलले जात आहे.
कर्नाटकातील सत्ताविरोधी लाट थोपवण्यासाठी योग्य मार्ग सापडला नाही. हे एक कारण भाजपच्या पराभवामागे असल्याचे सांगितले जाते. भाजप सत्तेत असली तरी सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड नाराजी तेथील मतदारांमध्ये दिसून आली. ही नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.