Manipur Violence: देशातल्या मणिपूर (Manipur) राज्याला सध्या महागाईचा सामना करावा लागत आहे. या राज्यातील जनतेला सरकारने ठरवून दिलेल्या सामान्य किमतीपेक्षा दुप्पट किमतीला वस्तू खरेदी कराव्या लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. गॅस सिलिंडरपासून (Gas Cylinder) ते बटाटे, कांदे, कडधान्ये आणि इतर भाज्यांचे दर वाढले आहेत. ऐवढंच नाही तर पेट्रोल (Petrol) देखील दुप्पट किमतीला खरेदी करावे लागत आहे. मणिपूरमध्ये गेल्या तीन आठवड्यांमध्ये जातीय हिंसाचारामुळे (Manipur Violence) जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.
मणिपूरमध्ये 3 मेपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या हिंसाचारामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील शाळेतील शिक्षिका मांगलेम्बी चानम यांनी सांगितले की, 'पूर्वी 50 किलोच्या तांदळाची गोणी 900 रुपयांना मिळत होती. पण आता त्यासाठी 1800 रुपये मोजावे लागत आहे. बटाटा आणि कांद्याच्या दरातही 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे. राज्याबाहेरून आणलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढली आहे.'
मांगलेम्बी चानम यांनी पुढे सांगितले की, 'काळ्या बाजारात गॅस सिलिंडर 1800 रुपयांना मिळत आहे. तर अनेक भागात पेट्रोलची किंमत 170 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली आहे. अंड्यांची किंमतही वाढ झाली आहे. 30 अंड्यांचा एक ट्रे 180 रुपयांना मिळत होता. मात्र आता त्यासाठी 300 रुपये द्यावे लागत आहे.' 'जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारे ट्रक सुरक्षा दलांनी निगराणीखाली ठेवले आहेत. नाही तर किंमती आणखी वाढल्या असत्या. सुरक्षा दलाच्या येण्यापूर्वी बटाट्याचे भाव 100 रुपये किलोवर गेले होते.', असे देखील त्यांनी सांगितले.
दरम्यान, मणिपूरमध्ये मैती समाजाने अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याची मागणी केली. याच्या निषेधार्थ 3 मे रोजी इंफाळ खोऱ्यात आदिवासी समाजाने मोर्चा काढला होता. यानंतर मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारात 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्याचसोबत जाळपोळ देखील करण्यात आली. त्यामुळे राज्यातील ट्रकच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
या मोर्चामुळे मणिपूरमध्ये हिंसाचार होऊ शकतो, अशी भीती वाहतूकदारांनी व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. या हिंसाचारात इंफाळ पश्चिम जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास राज्यात सुमारे 10,000 लष्कर आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले. संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, सुरक्षा दल राज्यातील स्थिती पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.