
कोलकाता: पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय यंत्रणांचा जो गैरवापर होत आहे, त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात नसून, भाजपमधील काही नेते या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं म्हटलं आहे. तसंच या सर्व यंत्रणा पंतप्रधानाच्या नव्हे तर, गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. ममता (Mamata Banerjee) यांच्या वक्तव्यामुळे त्या मोदींचा बजाव करत असल्याचं पाहायला मिळालं आहे.
पश्चिम बंगालच्या विधानसभेत ED , सीबीआय, आयटी ( CBI, IT) यांसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या गैरवापराविरोधात एक विधियेक मांडण्यात आलं होतं. यादरम्यान त्या बोलत होत्या. ज्या राज्यात भाजप नाही त्या राज्यांमधील बिगर भाजप नेत्यांना केंद्रीय यंत्रणांकडून त्रास दिला जातो, असा आरोप विरोधक सातत्याने करत असतात.
त्यामुळे या यंत्रणाच्या कारवाईला आळा घालण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आलं आल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर हे विधेयक 189 आमदारांच्या सहमतीने आणि 69 आमदारांच्या विरोधी मतदानात मंजूर करण्यात आलं आहे.
या विधेयकाच्या चर्चेदरम्यान बोलताना ममता म्हणाल्या, "मला विश्वास आहे की, केंद्रीय यंत्रणांचा जो गैरवापर करण्यात येतोय त्यामागे पंतप्रधान मोदी यांचा हात नसून, भाजपमधील काही नेते हे सर्व करत आहेत. शिवाय केंद्रीय यंत्रणा या पंतप्रधानांच्या अखत्यारीत येत नाहीत. तर त्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. केंद्रीय यंत्रणाच्या भीतीमुळे अनेक व्यावसायीक देश सोडून जात आहेत.
मात्र, हे सर्व पंतप्रधान करत आहेत यावर माझा विश्वास नाही. भाजपची वाटचाल आता हुकूमशाहिकडे सुरु असल्याची टीका देखील ममता यांनी यावेळी केली. तसंच या विधेयकाचा उद्देश कोणाच्याही विरोधात नसून केंद्रीय यंत्रणाच्या पक्षपाती कार्यप्रणालीवर आक्षेप घेण्यासाठी असल्याचंही त्यांनी सागंतलं.
भाजपच्या अधिकाऱ्यांवर ईडीने कारवाई केली तर पैशांचा ढीगारा सापडेल, मात्र, केवळ विरोधकांना टार्गेट करण्यासाठी या यंत्रणांचा उपयोग केला जात असून, पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय यंत्रणांच्या वाढत्या अतिरेकाकडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. एकीकडे पंतप्रधानांचे कौतुक करत असताना आपले जुने सहकारी आणि सध्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यावर मात्र ममता बॅनर्जींनी चांगलाच हल्लाबोल केला.
'केंद्रीय यंत्रणांना हात लावू नका', या सुवेंदू अधिकारी यांच्या मागील वक्तव्याचा दाखला देत ममता म्हणाल्या, ते म्हणत आहेत केंद्रीय यंत्रणांना हात लावू नका, मात्र यांचे किती पेट्रोल पंप,फ्लॅट्स आणि मालमत्ता आहे, याचा खुलासा त्यांनी करावा. शिवाय ते आता भाजपमध्ये गेल्यामुळे पवित्र झाले आहेत असा टोलाही त्यांनी अधिकारी यांना लगावला.
दरम्यान, या विधेयकाला विरोध करताना विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, हे विधेयक विधानसभेच्या नियमांच्या विरोधात आहे. मागे देखील या विधानसभेने राज्याचे नाव बदलून 'बंगा' करावं असा ठराव मंजूर करण्यात आला पण तसे झालेले नाही. तसंच केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात मंजूर केलेल्या या विधेयकाचा देखील काही परिणाम होणार नसून 'चोरांना पकडा, तुरुंग भरा' ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं अधिकारी यांनी सांगितलं.
Edited By - Jagdish Patil
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.