'मोदी हैं, तो मुमकिन हैं'; वीज संकटावरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा 'जोर का झटका'

देशातील वीज संकटावरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSAAM TV

नवी दिल्ली: देशभरातील अनेक राज्यांत सध्या कोळसा आणि वीज संकट आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शनिवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशातील अनेक भागांतील तापमान प्रचंड वाढले असून, वीजेची मागणीही वाढली आहे. शुक्रवारी अनेक राज्यांतील नागरिकांना वीज कपातीमुळं त्रासाला सामोरे जावे लागले. कोळसा आणि वीज संकटाच्या मुद्द्यावरून चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. उपलब्ध कोळसा, मोठे रेल्वेचे जाळे, थर्मल प्लांट्सच्या क्षमतेचा योग्यरितीनं वापर केला जात नाही. विजेचं संकट गहिरं झालं आहे. यात मोदी सरकारला दोष दिला जाऊ शकत नाही. हे सगळं काँग्रेसच्या ६० वर्षांच्या सत्तेमुळं झालं आहे, असा चिमटा चिदंबरम यांनी काढला.

PM Narendra Modi
Sakshi Dhoni: झारखंडमध्ये वीज संकट, साक्षी धोनीने सरकारला घेरले, म्हणाली...

देशातील अनेक भागांत वीज कपात केली जात आहे. कोळशाची टंचाई भासत आहे. या मुद्द्यावरून पी. चिदंबरम यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. देशावरील गहिऱ्या झालेल्या संकटांला कोळसा मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालय कारणीभूत नाही. हा सर्व दोष या मंत्रालयांच्या माजी मंत्र्यांचा आहे, जे काँग्रेसचे होते, असा चिमटा चिंदबरम यांनी काढला. मोदी हैं, तो मुमकिन हैं, असा थेट हल्लाबोलही त्यांनी केला.

देशातील अनेक भागांत वीजनिर्मिती प्रकल्प कोळसा संकटाचा सामना करत आहेत. रेल्वेने यावर मार्ग काढण्यासाठी कोळशाचा पुरवठा करता यावा, याकरिता अनेक पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत. कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांच्या फेऱ्या वाढवता याव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनीही कोळशाच्या टंचाईवर भाष्य केलं होतं. देशात कोळशाची टंचाई आहे. आपल्याकडे २१ दिवस पुरेल इतका कोळसा साठा हवा आहे, मात्र बऱ्याचशा वीज प्रकल्पांमध्ये केवळ एक दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली होती.

राहुल गांधींसह अनेक नेत्यांनी केंद्रावर साधला निशाणा

कोळशाच्या टंचाईवरून विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदींवर निशाणा साधला. मोदींना देश आणि जनतेची काळजी नाही का? असा सवाल त्यांनी केला. आगामी दिवसांत विजेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारकडे काय उपाययोजना आहेत, असा प्रश्नही काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला होता.

Edited By - Nandkumar Joshi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com