No Confidence Motion 2023 : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. अविश्वास प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हणण मांडलं. यावेळी विविध मुद्द्यांवर सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली.
मोदी सरकारने ९ वर्षात काय केलं याचा पाढाच सुप्रिया सुळे यांनी वाचला. महागाई, एलपीजीच्या वाढलेल्या किंमती, अर्थव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, ९ वर्षात ९ सरकार भाजपने पाडली सगळ्याची आठवण करुन देत सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. (No Confidence Motion)
मोदी सरकार शेतकरीविरोधी काम करत आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु, असं आश्वासन मोदी सरकारने दिलं होते. कोणत्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं, ते सरकारने स्पष्ट करावं. कांदा, दूध उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरु केली चांगली गोष्ट आहे. मात्र गरीबांसाठी जास्त ट्रेन वाढवल्या असत्या तर आणखी चांगलं झालं असतं. वंदे भारत ट्रेन कुठे थांबतात. वंदे भारत ट्रेन लोकांना फक्त पाहायला ठेवल्या आहेत. वंदे भारत गरीबांसाठी नाही, तर गरीब रथ गरीबांसाठी आहे. आम्ही ट्रेनचे थांबे वाढवण्याची मागणी करतोय, पण पूर्ण होत नाही, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
केंद्र सरकारचं कर्ज वाढत चाललं आहे. हे कर्ज आपण कसं फेडणार आहात. यामुळे तुम्हाला एलआसी, आयडीबीआय विकावं लागतंय, उद्या तुम्ही ओएनजीसी देखील विकून टाकाल. यामुळेच आम्ही हा अविश्वास प्रस्ताव मांडला आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
मणिपूर हिंसाचार प्रकरणावरुन तेथील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. लोक मरत आहेत, घरं जळत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहे. मात्र केंद्र सरकार असंवेदनशीलपणे वागत आहे. सरकारला मात्र मणिपूरचं काही पडलं नाही, असं दिसून येतंय, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.