
गुवाहाटी, आसाम: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात हायव्होल्टेज पॉलिटीकल ड्रामा सुरू आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू (The Radisson Blu Hotel Guwahati) या हॉटेलामध्ये थांबले आहेत त्या हॉटेलसमोर तृणमूल कॉंग्रेसच्या (AITC Assam) कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत आंदोलन केलं आहे. गुवाहाटीतील या आमदारांना परत पाठवा, हा राजकीय ड्रामा बंद करा आणि आसाममधील पूरग्रस्तांना मदत करा अशी मागणी करत तृणमूल कॉंग्रेसच्या (Trinamool Congress) कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली आहे. सध्या या हॉटेलला पोलिसांनी चारही बाजूंनी घेरलं असून हॉटेलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, त्यामुळे या परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे. (Eknath Shinde Latest News)
हे देखील पाहा -
आसाममध्ये भाजप सत्तेत आहे. आसामध्ये सध्या आलेल्या पुरामुळे अनेकजण दगावले तर प्रचंड आर्थिक नुकसानाही झालं आहे. अशा परिस्थितीत आसाममधील भाजपचं सरकार पुरग्रस्तांना मदत करण्यापेक्षा महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांची खातीरदारी करण्यात व्यस्त आहे असा आरोप या तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे आधी आसामच्या पुरग्रस्त जनतेला तात्काळ मदत करा अशी मागणी करत हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यातील अनेक कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हॉटेलच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.
याबाबत आसाममधील इतर विरोधी पक्षांनीही भाजपवर टीका केली होती. आसामच्या विरोधी पक्षांनी बुधवारी म्हटलं होतं की, राज्याचा सत्ताधारी पक्ष अशा वेळी राजकारण करण्यात व्यस्त आहे जेव्हा राज्य भयंकर पुराच्या नाशाखाली आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले, "महाराष्ट्रातील (बंडखोर) आमदारांवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारी संसाधनांचा वापर हा पुराच्या पार्श्वभूमीवर निर्दयी आणि क्रूरपणा आहे असं ट्वीट करत त्यांनी सरकारला धारेवर धरलं होतं.
त्याचप्रमाणे तृणमूल काँग्रेसचे आसामचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा म्हणाले की, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे ५५ लाख लोक पुरामुळे बाधित झाले असताना आणि ८९ लोकांना आपला जीव गमवावा लागला असताना महाराष्ट्रातून आलेल्या आमदारांचे "शाही आदरातिथ्य" करण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांचे हे द्वेषपूर्ण राजकारण असून त्यामुळे राज्यातील जनतेसाठी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले आहेत.
दुसरीकडे पूरग्रस्त रस्ते आणि घरांची छायाचित्रे शेअर करत, तृणमूल काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी ट्वीट केलं, "मी ऐकले आहे की महाराष्ट्रातील आमदार शिकार मोहिमेवर आसाममध्ये आले आहेत. आसामचे काही भाग पुरामुळे प्रभावित झाले आहेत, जेथे पिण्याचे पाणी आणि वीज नाही. कृपया हिमंता बिस्वा सर्मा यांचे लक्ष विचलित करू नका, त्यांचे या चिंताजनक परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे." असं ट्वीट करत त्यांनीही सरकारवर टीका केली.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.