Rajasthan Crime News : जयपूरमध्ये काही लोकांनी एका नवविवाहित जोडप्याला दिवसाढवळ्या मारहाण करून पळवून नेल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काही वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर दोघांनी 10 मार्च रोजी लग्न केले होते. मुलीच्या कुटुंबाला हे लग्न मान्य नव्हते. दरम्यान रविवारी मुलीचे नातेवाईक कार घेऊन जयपूरच्या हरमदा भागात पोहोचले आणि तिथे किरायाच्या घरात राहत असलेल्या नवविवाहित जोडप्याला त्यांनी सार्वजनिकरित्या बेदम मारहाण केली.
ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यानी दोघांनाही फरपटत नेत गाडीत टाकले आणि त्यांचे अपहरण करत पळवून नेले. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात अपहरण करण्यापूर्वी मुलीच्या कुटूंबियांनी दोघांना मारहाण केल्याचे आणि फरपटत नेऊन अपहरण केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. (Viral News)
मिळालेल्या माहितीनुसार जयपूर जिल्ह्यातील जामवरमगड येथे राहणारा 22 वर्षीय पृथ्वीराज हा फायनान्सचा व्यवसाय करतो. अनेक वर्षांपूर्वी तो त्याच्यापेक्षा एक वर्ष लहान असलेल्या पूजा योगीच्या प्रेमात पडला होता. पूजा योगी दोडाका ही डुंगर गावची रहिवाशी आहे.
नवरदेवाच्या वडिलांनी सांगितला घटनाक्रम
पृथ्वीराजचे वडील रामलाल यांच्या म्हणण्यानुसार दोघांनी अनेक वर्षांपासून पूजाच्या घरच्यांना लग्नासाठी राजी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मान्य केले नाही. यानंतर 10 मार्च रोजी दोघेही घरातून पळून गेले आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे आर्य समाज मंदिरात लग्न केले, असे रामलाल यांनी सांगितले. तसेच पूजाचे कुटुंबीय या लग्नामुळे खूप नाराज होते. लग्नानंतर दोघांनी हरमडा परिसरात भाड्याने घर घेतले होते आणि तेथून त्यांचे अपहरण झाले अशी माहिती त्यांनी दिली आहे. (Latest Marthi News)
नवरदेवाच्या वडिलांनी नोंदवली तक्रार
रामलाल यांनीच हरमदा पोलिस ठाण्यात त्यांचा मुलगा आणि सुनेच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले की, रविवारी १९ मार्च रोजी सून पूजाच्या कुटुंबातील अनेक लोक त्यांच्या हरमडा येथील घरी पोहोचले. यानंतर पूजाच्या नातेवाईकांनी नवविवाहित जोडप्याशी वाद घातला. त्यांना बेदम मारहाण केली आणि फरपटत बाहेर उभ्या असलेल्या एसयूव्ही कारकडे नेले. तिथे नववधूला उचलून फेकून दिल्याप्रमाणे कारमध्ये कोंबले. तसेच पृथ्वीराजलाही कारपर्यंत फरफटत नेले आणि तेथून ते फरार झाले.
ऑनर किलिंगचा संशय
पूजाच्या कुटुंबीयांनी आपला मुलगा आणि सुनेला इजा केल्याची भीती रामलाल यांनी पोलिसांसमोर व्यक्त केली आहे. ज्या पद्धतीने दोघांचे अपहरण करण्यात आले आहे, त्यावरून दोघांसोबत 'ऑनर किलिंग'सारखी घटना घडू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.