मुंबई : मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना रामभाउ म्हाळगी प्रबोधिनीमार्फत प्रशिक्षण देण्यास कॉंग्रेस नेते राजीव सातव यांनी आक्षेप घेतला होता. याची गंभीर दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तातडीने म्हाळगी प्रबोधिनीमार्फत अधिकाऱ्यांना देण्यात येत असलेले प्रशिक्षण तातडीने थांबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रानंतर प्रशिक्षण स्थगित करण्यात आले.
म्हाळगी प्रबोधिनीने भाईंदर उत्तन येथे मुंबई विद्यापीठातील सहाय्यक कुलसचिव, उपकुलसचिव व सक्षम अधिकारी यांच्यासाठी प्रशासकीय कामकाजाच्या मार्गदर्शनार्थ 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी या कालावधीत प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. प्रथम टप्प्यात विद्यापीठातील 30 अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठाने अधिकाऱ्यांची निवड केली. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी राजीव सातव यांनी म्हाळगी प्रबोधिनीमार्फत प्रशिक्षण देण्यास विरोध केला. याबाबतची तक्रार त्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे केली. याची दखल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दुसऱ्या दिवशीचे प्रशिक्षण तातडीने स्थगित करण्याचे आदेश दिले.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवसातील पहिले सत्र पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाकडून प्रशिक्षण थांबविण्यात आले. यानंतर विद्यापीठातील अधिकारी उर्वरित दोन सत्रे पूर्ण न करताच शिबिराच्या ठिकाणाहून परतले. विद्यापीठाने पुर्वीपासून प्रशिक्षण शिबिराचे नियोजन केले होते. अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार हे प्रशिक्षण तातडीने थांबविण्यात आले असल्याचे, विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी
विद्यापीठाने अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या पैशांचा गैरवापर केला आहे; म्हाळगी प्रबोधिनीमार्फत प्रशिक्षण देण्याच्या निर्णयाची चौकशी करावी, तसेच याप्रकरणी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी एनएसयूआय संघटनेचे राष्ट्रीय सचिव निखिल कांबळे यांनी केली आहे.
WebTittle :: Rambhau Mhalgi Institute Training in Mumbai University Stopped After Rajiv Satav Complaint
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.