CWG 2022 Ind Vs Aus Final: टीम इंडिया का हरली?; हरमनप्रीत, जेमिमानं सांगितला टर्निंग पॉइंट
IND vs AUS Womens Final CWG 2022: भारतीय महिला क्रिकेट संघाकडे कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सुवर्णपदक जिंकण्याची नामी संधी होती. पण आपल्याच काही चुकांमुळं त्यांना ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. रोमहर्षक सामन्यात अवघ्या ९ धावांनी पराभूत व्हावं लागल्यानं टीम इंडियाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या पराभवामुळं हरमनप्रीत आणि जेमिमा या दोघी कमालीच्या निराश झाल्या. पराभव का झाला याची कारणं त्यांनी सांगितली आहेत.
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (CWG 2022) यावेळी बर्मिंगहॅममध्ये होत आहे. महिला क्रिकेट स्पर्धेत (Womens Cricket) रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाला भारतीय गोलंदाजांनी ८ विकेट १६१ धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाकडून बेथ मुनी हिने ४१ चेंडूंवर सर्वाधिक ६१ धावा केल्या.
सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने भारतीय महिला संघ फलंदाजीसाठी उतरला. मात्र, भारतीय संघ १९.३ षटकांत १५२ धावाच करू शकला. अवघ्या ९ धावांनी टीम इंडियाला (Team India) पराभूत व्हावे लागले.
टीम इंडियाकडून कर्णधार हरमनप्रीत कौर हिने ४३ चेंडूंत ६५ धावांची तुफानी खेळी केली. मात्र, तिला संघाला विजय मिळवून देता आला नाही. या पराभवानंतर हरमनप्रीत कौर आणि स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज खूपच निराश झाल्या. त्यांनी सामन्याला कलाटणी देणारा क्षण सांगितला. त्यामुळेच संघाला पराभूत व्हावं लागलं, असं सांगितलं.
हरमनप्रीत कौरने एका वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितलं की, 'बघितलं तर रौप्य पदक मिळवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही पहिल्यांदाच ही स्पर्धा खेळत होतो. अशात रौप्य पदकाची कमाई करणे खूप मोठी गोष्ट आहे. एक वेळ अशी होती की आम्ही सामना जिंकू शकत होतो. मात्र, अखेरच्या चार-पाच षटकांत आम्ही विचार केला, तसं प्रत्यक्षात घडलं नाही. या खेळाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यावेळी सामना संपूर्ण तुमच्या बाजूने झुकलेला असतो. पण काही वेळानंतर परिस्थिती बदलते आणि तुमच्या हातून सामना पूर्णपणे निसटून जातो.'
'आम्ही सामन्यात एकापाठोपाठ एक विकेट गमावल्या. तोच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. आम्ही एकेरी-दुहेरी धावा घेतल्या असत्या तर विकेट राखून असतो. पण लागोपाठ विकेट गमावल्याने सामना गमावला. आमच्याकडे टॉप ४ मध्ये चांगले फलंदाज आहेत. त्यानंतर ऑलराउंडर आहेत. आता आम्ही आणखी एका नवीन फलंदाजाचा संघात समावेश करण्याचा विचार करत आहोत. कारण चार फलंदाजांवर तुम्ही अवलंबून राहू शकत नाहीत,' असंही हरमनप्रीत म्हणाली.
जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली की, 'प्रामाणिकपणाने सांगायचे झाले तर, सामना गमावल्याचे दुःख आहे, की रौप्य पदक मिळवल्याचा आनंद हे सांगणे खूपच कठीण आहे. सध्यातरी आमची यावर मिक्स फिलिंग आहे. रौप्य पदक जिंकलो याचा अभिमान आहे. महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच कॉमनवेल्थ गेम्स खेळला आहे. रौप्य पदक जिंकणे ही मोठी गोष्ट आहे. मला संघाचा अभिमान वाटतो.'
जेमिमानेही सामन्याला कलाटणी देणारा क्षण सांगितला. ऑस्ट्रेलियाला १६१ धावांवर रोखले. ही चांगलीच गोष्ट आहे. आम्ही चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही केले. हे आव्हान पार करणे शक्य होते. मात्र, सुरुवातीलाच दोन विकेट गमावल्या. मी आणि हरमनप्रीतने भागीदारी केली. त्या परिस्थितीत खूप कठीण होते. रणनीतीनुसार आम्ही खेळत होतो. पण माझी विकेट गेली. तोच या सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला, असे मला वाटते. मी आणि हरमनप्रीत कौर हा सामना जिंकवून देऊ शकत होतो. पण हे आमच्याही हातात नाही, असे जेमिमा म्हणाली.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.