India vs Bangladesh, Rohit Sharma : बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियानं मालिकाही गमावली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीवर गंभीर आरोप केले आहेत. संघ पूर्णपणे तंदुरुस्त नसलेल्या खेळाडूंसोबत खेळू शकत नाही, असं तो म्हणाला.
आता पूर्ण तंदुरुस्त नसलेले खेळाडू कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. संपूर्ण संघाला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाण्याची आवश्यकता आहे. खेळाडू तंदुरुस्त होऊन मैदानात परतल्यानंतर पुन्हा अनफिट होतातच कसे, यामागचे कारण जाणून घेणे गरजेचे आहे, याकडेही रोहित शर्माने लक्ष वेधले. (Cricket News)
रोहित शर्मा यानं दुसऱ्या वनडे सामन्यात पराभूत झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. एनसीएमध्ये बसून खेळाडूंच्या वर्कलोडवर लक्ष ठेवण्याची आपल्याला गरज आहे. आपण अनफिट असलेल्या खेळाडूंना देशाचं प्रतिनिधित्व करायला सांगू शकत नाही. देशाचं प्रतिनिधित्व करणं देशासाठी अभिमानाची बाब आहे. जर खेळाडू पूर्णपणे फिट नसेल तर ही परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे यामागचे कारण काय हे मूळापर्यंत जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला. (Rohit Sharma)
देशासाठी १०० टक्क्यांपेक्षा अधिक फिटनेसची गरज
रोहित शर्मा म्हणाला की, जेव्हा एखादा खेळाडू भारतासाठी खेळतो त्यावेळी तो १०० टक्क्यांपेक्षा जास्त फिट असला पाहिजे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या बांगलादेश मालिकेतून स्वतः कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळं बाहेर झाला आहे. दीपक चाहर आणि कुलदीप सेन हे देखील दुखापतीमुळं मालिकेतून बाहेर झाले आहेत. दीपक चाहरला तर वारंवार दुखापत होत आहे. आयपीएलआधीही तो दुखापतीमुळं खेळू शकला नव्हता. बऱ्याच कालावधीनंतर त्यानं संघात पुनरागमन केलं, पण पुन्हा तो जायबंदी झाला आहे.
अर्ध्या संघाला दुखापत
टीम इंडियातील दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी मोठी आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा यांसारखे खेळाडू दुखापतीमुळं संघाबाहेर आहेत. बुमराहनं तर बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन केलं. पण दोन - चार सामने खेळल्यानंतर तो पुन्हा अनफिट झाला. टी २० वर्ल्डकप स्पर्धाही तो खेळू शकला नाही. रवींद्र जडेजाही आशिया कपमध्ये दुखापत झाल्यापासून बाहेर आहे. तो अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे संघ पूर्ण क्षमतेने मैदानात उतरू शकला नाही. त्यामुळंच त्याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होत आहे, असे कारण सांगितले जाते.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीवर प्रश्नचिन्ह?
भविष्यातील खेळाडू आणि सध्याच्या टीम इंडियातील खेळाडूंच्या फिटनेसवर काम करणे तसेच त्यांच्या कामगिरीचा स्तर उंचावणे हे काम बेंगळुरूस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं आहे. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर, त्याला एनसीएमध्ये पाठवलं जातं. गेल्या काही महिन्यांत बुमराह, चाहर, शमी आदी खेळाडूंना एनसीएमध्ये पाठवण्यात आलं होतं. तिथे ते बराच वेळ होते. तिथून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच ते टीम इंडियात पुनरागमन करतात. पण काही सामने खेळल्यानंतर ते पुन्हा दुखापतग्रस्त होत आहेत. अशात एनसीएकडून खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष दिलं जात नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीसीसीआयनं याकडं विशेष लक्ष देण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.