नवी दिल्ली: एकेकाळी खोऱ्यानं धावा ओढणारा, 'रन मशीन' अर्थात विराट कोहलीची बॅट सध्या त्याच्यावर रुसली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकेक धावेसाठी विराटला झुंझावं लागत आहे. दुसरीकडे, खराब कामगिरीमुळं त्याच्यावर टीकाही होत आहे. या बॅडपॅचमधून स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या विराटवर आता त्याचाच माजी संघ सहकारी आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ख्याती असलेला विरेंद्र सेहवाग भडकला आहे. त्याच्या कामगिरीवर विरेंद्रनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ज्याच्यासाठी विराट ओळखला जातो, ती लय अद्याप त्याला सापडलेली नाही. आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत केल्या नाहीत, एवढ्या चुका त्याने एका आयपीएलमध्ये (IPL) केल्या आहेत, असं टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) म्हणाला.
विराट कोहलीनं (Virat Kohli) जवळपास ३ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलेलं नाही. विराट कोहलीचा हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही त्याची बॅट तळपली नाही. १६ सामन्यांत त्याने २२.७३ च्या सरासरीने ३४१ धावा केल्या आहेत. त्यात दोन अर्धशतके आहेत. यंदाच्या मोसमातील आरसीबी संघाचे आव्हानही संपुष्टात आले आहे. क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सने (RR) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला (RCB) ७ गडी राखून पराभूत केलं.
विरेंद्र सेहवागनं क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, आम्ही ज्या विराट कोहलीला ओळखतो, तो हा दिसत नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट खेळतच नव्हता असं वाटलं. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत केल्या नसतील, इतक्या चुका त्याने आयपीएलच्या एका मोसमात केल्या आहेत. भारताचा हा अव्वल फलंदाज वेगवेगळ्या रणनीती आखण्याच्या नादात बाद झाला, असंही सेहवाग म्हणाला. जेव्हा बॅटमधून धावा निघत नाहीत, तेव्हा असं घडतंच. धावा कशा निघतील याच विचारात आपली विकेट गमावून बसतात. कोहलीच्या बाबतीतही या मोसमात असंच काहीसं घडलं आहे, याकडेही विरेंद्र सेहवागनं लक्ष वेधलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.