IND VS AUS Rohit Sharma:ऑस्ट्रेलिया विरुध्द झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला आहे. यासह बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत १-० ची आघाडी घेतली आहे. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मात्र आपल्या यशाचे श्रेय रोहित शर्माने विराट कोहलीला दिले आहे.
गेल्या १ वर्षांपूर्वी विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधार पदावरून माघार घेतली होती. त्यानंतर रोहित शर्माला संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. आता रोहित शर्माने विजयाचे श्रेय विराटला देत म्हटले आहे की, "मला विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत."
रोहित शर्माने सामना झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, "जेव्हा मी विराटच्या नेतृत्वाखाली खेळायचो, त्यावेळी मी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केले. ती गोष्ट म्हणजे, विकेट मिळत असेल किंवा विकेट नाही मिळाला तरी विरोधी संघावर दबाव टाकणं सुरूच ठेवायचं. दबाव टाकल्याने फलंदाज चुका करतात. त्यामुळे मी देखील त्याच प्रयत्नात असतो."
तसेच तो पुढे म्हणाला की, "विरोधी संघावर दबाव टाकत राहायचं. प्रत्येक चेंडूवर विकेट मिळणार नाही. विकेट मिळवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. चेंडू योग्य टप्प्यावर टाकावा लागेल. खेळपट्टी मदत करेल परंतु त्याचा पुरेपूर फायदा करून घेता आला पाहिजे."
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना घेता आला नाही. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १७७ धावांवर संपुष्टात आला.
यादरम्यान रवींद्र जडेजाने ५ गडी बाद केले होते. त्यानंतर रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या आणि रवींद्र जडेजा, अक्षर पटेलच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४०० धावांचा डोंगर उभारला. यासह भारतीय संघाने २२३ धावांची आघाडी घेतली.
तर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा डाव अवघ्या ९१ धावांवर संपुष्टात आला. यासह हा सामना भारतीय संघाने १ डाव आणि १३२ धावांनी आपल्या नावावर केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.