मुंबई: भारताचा इंग्लंड दौरा काल, रविवारी आटोपला. या दौऱ्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-२० मालिका आणि नंतर वनडे मालिकाही जिंकली. इंग्लंडचा या दोन्ही मालिकांमध्ये पराभव केला. या दोन्ही मालिकांमध्ये टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी बलाढ्य इंग्लंडवर वर्चस्व गाजवलं. यात भारतीय खेळाडूंनी अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर नोंदवले. त्यात रिषभ पंत, हार्दिक पंड्या, मोहम्मद शामी, रोहित शर्मा आणि बुमराहचा समावेश आहे. त्यांनी केलेल्या विक्रमांवर एक नजर. (Rohit Sharma Jasprit Bumrah Mohammed Shami Rishabh Pant Hardik Pandya Made this 10 record)
भारताचा वेगवान गोलंदाज आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने इंग्लंड विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. पहिल्या वनडे सामन्यात त्याने १९ धावा देऊन सहा विकेट घेतल्या. बुमराहच्या वनडे कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
द ओव्हलवर खोचक मारा करून बुमराहने इंग्लंडविरुद्ध (India vs England) आशिष नेहराचा एक विक्रमही मोडीत काढला. २००३ मध्ये वर्ल्डकप स्पर्धेत नेहराने इंग्लंडविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी करून २३ धावा देत सहा विकेट घेतल्या होत्या. १९ वर्षांनंतर नेहराचा हा विक्रम बुमराहने मोडला.
इतकंच नाही तर, बुमराहच्या या कामगिरीमुळं वनडे प्रकारात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंच्या यादीतही त्याने स्थान पटकावले. या यादीत पहिलं नाव स्टुअर्ट बिन्नीचं येतं. २०१४ मध्ये बिन्नीनं बांगलादेशविरुद्ध मीरपूरमध्ये ४.४ षटके टाकून केवळ चार धावा दिल्या होत्या आणि सहा विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानी अनिल कुंबळे आहे. कुंबळेने वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकातामध्ये १९९३ मध्ये १२ धावा देत सहा विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर आता बुमराहनं स्थान मिळवलं आहे. त्याने १९ धावा देत ६ विकेट घेतल्या आहेत.
याशिवाय बुमराहने आणखी एक कारनामा केला आहे. द ओव्हलमध्ये घातक गोलंदाजी करत, आशियाबाहेर देशाकडून खेळताना वनडे प्रकारात सर्वश्रेष्ठ कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. कुलदीप यादवनंतर इंग्लंडमध्ये एकाच डावात ६ विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कुलदीपनेही १२ जुलैलाच २५ धावा देऊन सहा विकेट घेतल्या होत्या.
मोहम्मद शामी वनडेमध्ये १५० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणारा १३ वा गोलंदाज ठरला आहे. तर सर्वात वेगवान १५० विकेट घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. शामीनं हा विक्रम ८० व्या सामन्याच्या ७९ व्या डावात केला आहे. त्याच्या आधी हा विक्रम माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरच्या नावावर होता. आगरकरने ९७ व्या सामन्यात ही कामगिरी केली होती.
हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) नुकत्याच झालेल्या वनडे सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने इंग्लंडविरुद्ध गोलंदाजी करताना २४ धावा देऊन चार विकेट घेतल्या. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी त्याने ३१ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या.
रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिकाही जिंकली. या मालिकेच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांतही भारतानं विजय मिळवला होता. त्यानंतर लागोपाठ १३ टी-२० सामने कर्णधार म्हणून जिंकून देणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. शर्माच्या आधी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनाही अशी कामगिरी करता आलेली नव्हती.
भारताला कर्णधार म्हणून धोनीने टी-२०मध्ये ४१ विजय मिळवून दिले आहेत. त्यानंतर विराट कोहलीचं नाव येतं. त्याने ३० सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. आता रोहित शर्माचं नावही या यादीत आलं आहे. शर्माने केवळ ३१ सामन्यांपैकी २६ सामने भारताला जिंकून दिले आहेत.
टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि विकेटकीपर रिषभ पंत हा सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने ११३ चेंडूंत १२५ धावांची तुफानी खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. पंतच्या वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.