Team India News Update : अवघ्या क्रिकेटविश्वाला भारतीय संघातील दिग्गजांनी आपल्या विस्फोटक खेळीनं भुरळ घातलीय. त्यातले युवराज सिंगचे सलग सहा चेंडूंत सहा षटकार तर प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या कायम लक्षात राहिलेत. टी २०, कसोटी किंवा एकदिवसीय असो; क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ज्यांनी आपल्या बहारदार फटकेबाजीतून जगाचं लक्ष वेधून घेतलंय त्यात युवराज सिंग आहेच. अशा महान फलंदाजांमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सुरेश रैना आणि इतर फलंदाजांचीही नावं घेतली जातात.
क्रिकेटचा अलीकडचा काळ बघता तिन्ही प्रकारांत धडाकेबाज कामगिरी करणारा क्रिकेटपटू एखादाच बघायला मिळतोय. कारणही तसंच आहे. कसोटी, वनडे आणि टी २० मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर, त्यासाठी वेगवेगळे कौशल्य आत्मसात करावे लागतात. कसोटीत बचावात्मक खेळाचा कस लागतो. तर वनडेमध्ये डाव सावरण्याची क्षमता असावी लागते, तर टी २० मध्ये आक्रमक फलंदाजी करावी लागते.
वर ज्या क्रिकेटपटूंचा उल्लेख केला आहे, त्यांनी क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवून दिली आहे. पण असे काही फलंदाज आहेत, ज्यांनी टी २० मध्ये आपल्या फलंदाजीनं प्रतिस्पर्ध्यांना पळता भुई थोडी केलीय, पण वनडेमध्ये ते सपशेल अपयशी ठरलेत किंवा ठरत आहेत. (Cricket News Update)
आयसीसीच्या टी २० रँकिंगमध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव हा अव्वल स्थानी आहे. तो ४८ टी २० सामने खेळलाय. त्यात त्यानं १६७५ धावा कुटल्यात. त्याचा स्ट्राइक रेट १७५.७६ आहे. टी २० मध्ये त्याच्या फटकेबाजीची नजाकत काही औरच. त्यामुळं त्याला 'मि. ३६०' या नावानंही संबोधलं जातं. (Team India)
सूर्यकुमार यादवला वनडेत का खेळवलं जात नाही असा सवाल चाहत्यांकडून उपस्थित केला जात होता. त्याचवेळी त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं. याआधीही त्याला संधी दिली गेली. पण त्यात तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. २२ सामन्यांमध्ये त्यानं अवघ्या ४३३ धावा केल्यात. त्याच्या धावांची सरासरी २५.४७ इतकी आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत तर त्याला भोपळाही फोडता आला नाही. तो जरी अपयशी ठरला असला तरी कर्णधार रोहित शर्मा आणि टीम व्यवस्थापन त्याच्या भक्कमपणे पाठिशी आहेत. त्याला आणखी संधी देऊ कारण त्याच्यात क्षमता आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. अशात आता तो पुढील सामन्यांमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करणार का, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक यानं ६० टी २० सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय. तो ४८ डाव खेळला आहे. त्याने ६८६ धावा केल्यात. त्याचा स्ट्राइक रेट १४२.६१ इतका आहे. त्यानं टी २० मध्ये एकमेव अर्धशतक केलंय. पण त्यानं अनेकदा लक्षवेधी कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला आहे.
टी २० मध्ये आक्रमक वाटणारा कार्तिक वनडेमध्ये हवा तसा प्रभाव पाडू शकला नाही. ९४ सामने तो खेळलाय. त्यात त्यानं १७५२ धावा केल्यात. धावांची सरासरी ३०.२ इतकी आहे. स्ट्राइक रेट ७५ पेक्षा कमी आहे. २०१९ च्या सेमिफायनल सामन्यानंतर त्याला वनडे संघातून वगळण्यात आलं.
दीपक हुडा हा अप्रतिम फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्यानं वनडे आणि टी २० मध्ये गेल्याच वर्षी पदार्पण केलंय. सध्या तो टी २० संघातील महत्वाचा खेळाडू आहे. त्याला वनडे संघातून वगळण्यात आलं आहे.
टी २० मध्ये १७ डावांत त्यानं ३६८ धावा केल्यात. त्याचा स्ट्राइक रेट दीडशेच्या जवळपास आहे. या प्रकारात त्यानं शतकही ठोकलं आहे. पण वनडेमध्ये १० सामन्यांत अवघ्या १५३ धावाच करू शकला. ३३ हा त्याचा बेस्ट स्कोर आहे. तर स्ट्राइक रेट साधारण ८० आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर त्याला वनडे संघात घेतलं नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.