सोलापूर - राज्यातील दुष्काळ तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पंढरपुरातील पुरामुळे या भागांतील दोन लाखांहून अधिक हेक्टरवरील उसाचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यांना गाळपाच्या ऑनलाइन परवान्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, आतापर्यंत २६ कारखान्यांनी अर्ज केले आहेत. उसाचे उपलब्ध क्षेत्र व गाळपासाठी कारखान्यांच्या उदासीनतेमुळे यंदाचा गाळप हंगाम १ ऑक्टोबरऐवजी १ नोव्हेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.
मागील वर्षी राज्यात पावसाने दडी मारल्याने उसाची लागवड झाली नाही. यावर्षीही सोलापूर, उस्मानाबादसह अन्य जिल्ह्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षाच आहे. जूनपूर्वी गाळपासाठी साडेसहा लाख हेक्टर ऊस शिल्लक असल्याचा अंदाज होता. मात्र, पूर आणि पावसाची दडी यामुळे त्यात आणखी दोन लाख हेक्टरची घट झाली आहे. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम महिनाभर लांबणीवर पडणार असून तो ५० ते ६० दिवसच चालेल. साखरेचे उत्पादनही ५० लाख मेट्रिक टनांपर्यंतच होईल, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक घेतली जाणार असल्याचेही साखर आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर आणि पंढरपुरातील पूरस्थितीमुळे तेथील उसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. मागील वर्षीच्या दुष्काळात उसाचा वापर चाऱ्यासाठी करण्यात आला. गाळपासाठी साडेचार लाख हेक्टर उसाचे क्षेत्र शिल्लक असून, त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम नोव्हेंबरपासून सुरू होईल.
- दत्तात्रेय गायकवाड, सहसंचालक, विकास, साखर आयुक्तालय, पुणे
Web Title: Sugar Factory Sugarcane Galap Season Late
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.