ज्यांना कोकणानं नाकारलं त्यांना आमच्या गुप्त बैठकीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही: उदय सामंत  (पहा व्हिडिओ)

uday samant.jpg
uday samant.jpg

मुंबई : ''माझं राजकीय अस्तित्त्व अस्थिर करण्यासाठी माझी  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)  यांच्यासोबत गुप्त भेट झाली, असं ट्वीट (Tweet)  करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत बसत नाही. ज्यांना कोकणानं (Kokan)  नाकारलं त्यांना माझ्या आणि फडणवीसांमधील गुप्त बैठकीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant)  यांनी भाजपा नेते नीलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Those who were rejected by Konkan have no right to speak about our secret meeting ) 

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक नेते नुकसान झालेल्या किनारपट्टी भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  सध्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपाचे  माजी खासदार नीलेश राणे यांनी ही गुप्त भेट झाल्याचा दावा केला आहे. याला मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर  दिले आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी नीलेश राणे यांचा दावा फेटाळून लावला असून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

''ही घटना सहा दिवसांपूर्वी झाली आहे, त्यावेळी मी रत्नागिरी दौऱ्यावर होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीसही तिथे आले  होते. महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधकही समोर आले तर त्यांचे स्वागत करण्याची पद्धत आहे.  देवेंद्र फडणवीस माझ्या मतदार संघात आले होते त्यांना हाय बाय  करणं यात काहीच चुकीचं नाही,  हे मी समजतो. तसेच, ज्यांनी असे आरोप केले आहेत ते  त्यावेळी प्रचंड लांब होते. सर्व पक्षाचे पदाधिकारीही समोर होते. अशावेळी जर आम्हाला गुप्त बैठक करायची असती तर इतर राज्यात किंवा जिल्ह्यात केली असती. ती रत्नागिरीत 200 लोकांसमोर का करणार, माझ्या मतदार संघात का करणार आणि रत्नागिरीच्या विश्रमगृहातच का करेल, असे  सवालही त्यांनी यावेळी विचारले आहेत.  त्यामुळे विरोधी पक्षांच्या अशा आरोपांमुळे माझे कोणतेही राजकीय नुकसान होणार नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.  

तसेच, राणे कुटुंबीयांनी आजपर्यंत केलेल्या आरोपांची मी कधीही दखल घेतली नाही आणि भविष्यातही  घेणार नाही. मात्र ज्यांना कोकणाने दोनवेळा नाकारलं ते या बैठकीबाबत बोलत आहेत.  शिवसेना पक्षप्रमुख आणि  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री  आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी ऑपरेशन लोटसवरही निशाणा साधला.  मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला म्हणून  राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्याशी संबंध तुटले अस होत नाही. महाविकास आघाडीत तितकाच आदर आम्ही एकमेकांशी करतो. आमची महाविकास आघाडी मजबूत आहे. कारण भविष्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार आहे. याठिकाणी ऑपरेशन लोटसची गरज नाही. असा खोचक टोलाही उदय सामंत यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनादेखील सल्ला दिला आहे. राज्याची राजकीय संस्कृती बिघडविण्याऱ्याना आपण बरोबर ठेवणार असाल तर, भविष्यातील महाराष्ट्राचं राजकारण काय असेल,  याची प्रचिती तुम्हाला आजच्या ट्वीटवरुन कदाचित आली असेल. असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.   

Edited By- Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com