Jack Dorsey Claims Indian Government: ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. भारतात कृषी कायद्यांविरोधात झालेल्या किसान आंदोलनावेळी सरकारने अनेक ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Latest Marathi News)
यासाठी भारत सरकारने आपल्यावर दबाव आणला होता आणि भारतात ट्विटर बंद करण्याची धमकी दिली होती, असं डॉर्सी यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली असून यामुळे पुन्हा एकदा विरोधक मोदी सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
नुकतीच 'ब्रेकिंग पॉइंट्स' या यूट्यूब चॅनलने ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. यातील एक प्रश्न असा होता की, त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न कधी सरकारकडून (Government) झाला होता का? प्रत्युत्तरात डॉर्सी यांनी असे अनेकवेळा घडल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी भारताचे उदाहरण दिले.
डॉर्सी म्हणाले की, 'भारतात कृषी कायद्यांविरोधात झालेल्या किसान आंदोलनावेळी (Farmers Protest) सरकारने अनेक ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे पालन न केल्यास सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्याची धमकी दिली होती. इतकंच नाही, नियम न पाळल्यास ट्विटरचे कार्यालय सुद्धा बंद करू अशी धमकी सुद्धा दिली होती'.
भारतासारख्या लोकशाही देशात हे सर्व घडल्याचे डॉर्सी यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे डॉर्सी यांनी तुर्कस्तानचेही उदाहरण देत सांगितले की, त्यांच्या देशातही ट्विटर बंद करण्याची सरकारकडून धमकी देण्यात आली होती. डॉर्सी म्हणाले की त्यांच्या कंपनीने तुर्कीमध्ये सरकारविरुद्ध अनेक खटले लढले आणि जिंकले.
दरम्यान, नोव्हेंबर 2020 मध्ये, भारत सरकारने देशात तीन कृषी कायदे लागू केले. मात्र, कायदा लागू होताच त्यांचा विरोधही सुरू झाला आणि वर्षभरापासून देशभर आंदोलने झाली. अखेर एका वर्षानंतर म्हणजेच नोव्हेंबर २०२१ मध्ये केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. आंदोलनादरम्यान सरकारला सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.